Books
Polls
| Amartya Sen Work - Arthat |
|
|
|
| Written by deepa |
| Wednesday, 05 January 2011 12:31 |
Amartya Sen Workअमर्त्य सेन यांचं योगदान
अमर्त्य सेन यांनी `वेल्फेअर इकॉनॉमिक्स' (लोककल्याण) आणि `इकॉनॉमिक डेव्हलपमेंट' (आर्थिक विकास) या क्षेत्रात गेल्या 25 वर्षात प्रचंड संशोधन केलं. माणसाच्या रहाणीमानात सुधारणा होणं म्हणजे त्यानं फक्त जास्त खर्च करणं असं नसून त्याचा सर्वांगीण विकास होणं हे आहे असं अमर्त्य सेन यांनी ठासून सांगितलं. याबरोबरच त्यांनी `इकॉनॉमिक ग्रोथ (आर्थिक वाढ)' आणि `इकॉनॉमिक डेव्हलपमेंट (आर्थिक विकास )' यांच्यातला फरक स्पष्ट केला. आर्थिक वाढीमध्ये फक्त राष्ट्रीय उत्पादनाची वाढच लक्षात घेतली जाते. तर आर्थिक विकासामध्ये लोकांच्या उत्पन्नाबरोबरच लोकांचं शिक्षण, आरोग्य आणि एकंदरीतच रहाणीमानातल्या सुधारणा लक्षात घेतल्या जातात. आजकाल जगभर फक्त जीडीपीमधल्या वाढीविषयी चर्चा करन आर्थिक वाढीचे सण साजरे करण्याच्या जगभरच्या - विशेषतः भारतातल्या अर्थतज्ज्ञांच्या प्रवृत्तीबरोबर अमर्त्य सेन मुळीच सहमत नाहीत. याउलट ख-या आर्थिक विकासाकडे आणि लोकांना विकासाच्या संधी उपलब्ध करुन देण्याकडे आपण जास्त लक्ष दिले पाहिजे असं सेन म्हणतात.
सर्व माणसं ही तर्कशुद्ध विचार करून, विवेकवादी (रॅशनल) पद्धतीनं निर्णय घेतात आणि आपलं सर्वोच्च हित कशात आहे ते बघतात आणि साधतात हेच सेन यांना मान्य नव्हतं. हे मत असणारी मंडळी असं मानत की प्रत्येकानं असा स्वतःच्या भल्याचा विचार केला तर त्यामुळे `पेरेटो ऑफ्टिमल' अशी परिस्थिती निर्माण होईल आणि त्यामुळे सगळ्यांचंच भलं होईल किंवा वेल्फेअर वाढेल. याविरद्ध तर्क करताना सेन मतदानाचं उदाहरण देतात. निवडणुकांच्या वेळी माणसं मतदान करतात तेव्हा ते वैयक्तिक स्वार्थासाठी नसतं. खरं तर माझ्या एकटय़ाच्या मतामुळे उमेदवार निवडून येण्याची जी शक्यता असते त्यापेक्षा बरीच जास्त शक्यता मी मत द्यायला जाताना अपघातात किंवा वीज अंगावर पडून मरण्याची असते. पण तरीही मी मत देतो. याचा अर्थ मी प्रत्येक गोष्ट फक्त स्वतःच्याच फायद्याकरता करतो असं नाही.
प्रत्येकाने स्वार्थीपणानं, क्षणाक्षणाला फक्त स्वतःला फायदा होईल असं वागायचं ठरवलं तर खूप गोंधळ माजतील असं सेन म्हणतात. याकरता ते एक उदाहरण देतात. समजा, मला कोणीतरी `रेल्वेस्टेशन कुठे आहे?' असं विचारलं आणि त्याचवेळेला समजा मला पोस्टात एक पत्र टाकायचं आहे. म्हणून हा आयता बकरा मिळालाय म्हणून मी त्या माणसाला शेंडय़ा लावून पोस्टाच्याच दिशेनं बोट दाखवत `रेल्वेस्टेशन त्याच बाजूला आहे' असं सांगून आणि त्याला जाता जाता माझं पत्र टाकायला सांगितलं तर काय होईल? आता यावेळी तो माणूस जर तितकाच स्वार्थी आहे असं गृहीत धरलं तर तो माणूससुद्धा पोस्टात जाण्याच्या अगोदर `यात काही मौल्यवान गोष्टी लपवल्या आहेत की काय?' असा विचार करन ते पाकीट चक्क उघडेल आणि मग सगळंच ओमफस् होईल!
प्रत्येकानं स्वतःच्या फायद्याकडे बघण्याच्या धोरणामुळे सगळ्यांचं वेल्फेअर वाढेल ही थिअरी सेन यांनी अमान्य केली आणि त्याऐवजी लोकांच्या पात्रतेचा विचार करावा असा (केपेबिलिटीज सेंटर्ड) दृष्टीकोन त्यांनी मांडला. या थिअरीप्रमाणं लोक ज्या गोष्टी चांगल्या कर शकतात, त्या त्यांनी केल्या तर त्यामुळे त्या समाजाचंही भलं होतं आणि लोकांनाही आनंद आणि समाधान लाभतं. सेन यांच्या मते साक्षरता ही चांगलीच पण ती केवळ साक्षरतेच्या होणा-या फायद्यामुळे नव्हे तर त्यामुळे माणूस हा जास्त सुसंस्कृत बनतो म्हणून! लोकांना कुठलीही गोष्ट करताना किती पर्याय आहेत आणि त्यांच्यापैकी कुठलाही निवडण्याचं किती स्वातंत्र्य आहे यावर मानवी कल्याण (वेल्फेअर) अवलंबून असतं असं सेन म्हणतात. शिक्षणामुळे लोकांना अनेक पर्याय मिळायला लागतात आणि त्यामुळे त्यांचं वेल्फेअर सुधारतं, म्हणून शिक्षणाचं महत्त्व. अशिक्षित लोकांना यातले कुठलेच पर्याय निवडण्याचं स्वातंत्र्य नसतं आणि त्यामुळे त्यांचं वेल्फेअर हे सगळ्यात कमी असतं.
अमर्त्य सेन याच मुद्दय़ावरुन आर्थिक वाढ आणि आर्थिक विकास यांच्यात फरक करतात. कित्येक देशांमधे आर्थिक वाढीचा दर कमी असला तरी आर्थिक विकास मात्र झपाटय़ानं वाढू शकतो. आणि अशा समाजामधे शिक्षण आणि आरोग्य या सेवा सर्वसामान्य जनतेला चांगल्या त-हेनं मिळतात आणि त्यामुळे लोकांच्या क्षमता, त्यांच्यापुढे असलेले पर्याय आणि म्हणूनच एकंदरीत वेल्फेअर या गोष्टी वाढतात. याचमुळे अमर्त्य सेन कुठल्याही अर्थव्यवस्थेच्या यशाचं मोजमाप हे तिथल्या साक्षरतेमधे झालेल्या वाढीनं करतात.
हा आर्थिक विकास (वाढ नाही) कमी असेल तर पुरुषांपेक्षा बायकांना त्याचे जास्त तोटे सहन करावे लागतात असं सेन म्हणतात. उदाहरणार्थ गरीब राष्ट्रंमधे मर्यादित उत्पन्न असताना `मुलाच्या शिक्षणावर खर्च करायचा की मुलीच्या?' हा कठोर निर्णय घ्यावा लागतो तेव्हा अर्थातच मुलंच जास्त शिकतात. याशिवाय समाजातल्या प्रथा, चालीरीती आणि मागासलेले विचार हे यात आणखीनच भर टाकतात. म्हणूनच गरीब कुटुंबांमधे बायकांच्या निरक्षरतेचं प्रमाणही जास्त असतं. हे जसं शिक्षणाचं, तसंच आरोग्याचंही असतं हे सेन दाखवून देतात. पुरुषांपेक्षा बायका जास्त गंभीरारीत्या आजारी पडल्या तरच त्या हॉस्पिटलमधे जातात. शिवाय गरीब जनतेतल्या बायकांना पुरुषांपेक्षा आणखीनच कमी पौष्टिक अन्न खायला मिळतं असं सेन यांनी 1984 मध्ये अभ्यासानं दाखवून दिलं.
या विषमतेच्या परिणामांविषयी सेन यांनी बरंच काही लिहिलंय. श्रीमंत देशांमधे दर 100 पुरषांमागे 105 बायका आहेत तर गरीब देशांमधे 100 पुरषांमागे 94 च बायका आहेत. जर गरीब देशात सुद्धा बायकांना जास्त समानतेनं वागवलं असतं तर तिथेही दर 100 पुरषांमागे 100 ते 105 च्या दरम्यान बायका मिळायला पाहिजे होत्या. पण त्या 94 च आहेत म्हणजेच दर 100 पुरषांमागे 9 ते 10 बायका आज जास्त जिवंत असत्या. अमर्त्य सेन यांच्या गणिताप्रमाणे अजून 10 कोटी बायका तरी गरीब देशात जिवंत राहू शकल्या असत्या! आणि म्हणून नैतिक आणि आर्थिक या दोन्हीही कारणांमुळे आर्थिक विकास साधायचा असेल तर प्राधान्याने बायकांना साक्षर आणि सक्षम करण्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे असं सेन म्हणतात. लहानपणी आणि तरुणपणी सगळ्यांना आणि विशेषतः मुलींना सकस आहार आणि चांगलं शिक्षण मिळालं तर आर्थिक विकास मोठय़ा प्रमाणावर होईल असं सेन म्हणतात.
1970 साली अमर्त्य सेन यांनी `कलेक्टिव्ह चॉईस अँड सोशल वेल्फेअर' लिहून `केनेथ ऍरो'च्या `इम्पॉसिबिलीटी थिअरम'ला उत्तर दिलं. ज्यामुळे विवेकवादी (`रॅशनल') आणि समानतेवर आधारलेली (`इगॅलिटेरियन') अशी दोन्ही साध्यं एकाच वेळी गाठता येतील अशी मतदान पद्धती काढताच येणार नाही हे या `इम्पॉसिबिलीटी थिअरम'मधे मांडलं होतं. थोडक्यात लोकशाहीत या दोन्ही गोष्टी एकाच वेळी नांदू शकत नाहीत असाच निष्कर्ष `ऍरो'च्या थिअरमवरून निघत होता. पण सेन यांनी तसं होण्याचं कारण नाही हे दाखवून दिलं.
सेन यांनी 1973 साली `ऍन इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी'मधे दारिद्रय़रेषेखालच्या लोकांमधेही असलेल्या वेगवेगळ्या पातळ्यांमधल्या विषमतेवर आधारलेला एक फॉर्म्युला काढला. शिक्षण, आरोग्य, आयुष्यमान वगैरेंवर आधारलेला `ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स (एचडीआय)' हा आज आर्थिक वाढीइतकाच महत्त्वाचा मानला जातो. जरी या एचडीआयवर सेन यांचा प्रभाव असला तरी सेन मात्र त्यातल्या त्रुटींमुळे त्याला `व्हल्गर' म्हणतात!
1980 च्या दशकाच्या सुरवातीला सत्यजीत रे यांनी `अशांती संकेत (डिस्टंट थंडर)' नावाचा एक सिनेमा 1943 सालच्या पश्चिम बंगालच्या दुष्काळावर काढला होता. त्यात `या दुष्काळाची कारणं नैसर्गिक नसून मानवी आहेत' असं चितारलेलं होतं. युद्धाच्या भीतीनं सावकारांनी धान्य उगाचच साठवून आणि दडवून ठेवलं होतं. प्रत्यक्ष उत्पादन अपुं नव्हतं असं त्यात सुचवायचं होतं. त्याच सुमारास 1981 साली सेन यांनी `पॉवर्टी अँड फॅमिन्स' हे महत्त्वाचं पुस्तक लिहिलं. `उत्पादनापेक्षा वितरणातल्या त्रुटींमुळे दुष्काळ निर्माण होतात' हेच त्यात मांडलं होतं. जिथे दुष्काळ आहे अशा कित्येक प्रांतातून धान्याची निर्यात होते हे त्यांनी दाखल्यादाखल दाखवून दिलं आणि आपला दुष्काळाकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलला.
सेन यांनी लोकशाहीचाही दुष्काळाशी संबंध लावला, आणि दुष्काळ हे लोकशाहीमधे पडत नाहीत असं मांडलं. यासाठी त्यांनी भारत आणि चीन यांचा दाखला दिला. सेन आणि बेल्जियन अर्थतज्ञ ड्रेझी यांनी `इंडियाः इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड सोशल ऍपॉर्च्युनिटीज' या 1995 साली लिहिलेल्या पुस्तकात 1943 सालापासून भारतामधे एकही दुष्काळ पडला नाही असं मांडलं, आणि त्याचबरोबर चीनमधे 1958 ते 1961च्या दरम्यान दीड ते तीन कोटी लोक हे भयाण दुष्काळात मरण पावले असंही सांगितलं. कुठेही जरी पाउस कमी पडला किंवा पीक कमी आलं तरी लोकशाहीमधे मतं मिळवण्यासाठी किंवा लोक आरडाओरडा करतील या भीतीनं सरकारला काहीतरी पाऊलं उचलावीच लागतात. आणि म्हणून परिस्थिती एका मर्यादेच्या पलीकडे गंभीर बनत नाही. पण हुकूमशाहीत मात्र दुष्काळ तीव्र होऊ शकतो असं सेन यांनी मांडलं. हे अर्थात चीनवादी कम्युनिस्टांना खूपच झोंबलं होतं!
`अतिशय चांगल्या त-हेनं काम करणारी बाजारपेठ असली तरी, जर शिक्षण आणि आरोग्य यांच्याकडे दुर्लक्ष झालं असेल, आणि जर जमीनवाटप योग्य प्रमाणात झालं नसेल (म्हणजेच जमिनीच्या मालकीमधे प्रचंड विषमता असेल), जातीजातींमधे आणि स्त्री-पुरुषांमधे सगळ्या (शिक्षण, नोक-या..) बाबतीत खूप भेदभाव केले जात असतील, तर मानवी क्षमता (ह्यूमन केपेबिलिटीज) पूर्णपणे विकसित होत नाहीत. आणि मग निर्माण होणारे प्रश्न कितीही उत्तम त-हेनं चालणारी बाजारपेठेची व्यवस्था असली तरीही ती सोडवू शकत नाही' हे सेन यांनी मांडलं. या गोष्टींकडे दुर्लक्ष करणा-या सरकारला लोकशाही पद्धतीनं कडक विरोध केला पाहिजे असंही त्यात त्यांनी सुचवलंय आणि हे भारताच्या आजच्या परिस्थितीला तंतोतंत लागू आहे! एकूण फक्त आर्थिक वाढीचा दर आणि मुक्त अर्थव्यवस्थेचे गोडवे गाणा-या मार्केट फंडामेंटालिस्टांच्या वादळी बजबजाटामध्ये सेन यांची एकतरी मानवतावादी फुंकर आहे हे मात्र निश्चित! |
Created by Apoorv Deshmukh Designed by Deepa Deshmukh


